किल्ले शिवनेरीवर स्वराज्य संग्रामने केली स्वच्छता मोहीम

पिंपरी , दि.२३ :-  शिवजयंती उत्सव नंतर स्वराज्य संग्रामच्या वतीने किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गेली दहा वर्षे अखंडपणे ही परंपरा जपली जात असून, १९ फेब्रुवारीच्या शासकीय शिवजयंतीनंतर २० फेब्रुवारीला स्वराज्य संग्रामची टीम किल्ल्यावर पोहोचते.

शिवजयंती व इतर दिवशी येणारे पर्यटक शिवनेरीवर भेट द्यायला येतात पण जाताना मात्र काही गोष्टींची काळजी घेत नाहीत. गडकिल्ले या फक्त वास्तू नाहीत तर ते आपल्याला ऐतिहासिक महत्त्व देणारे एकमेव घटक आहेत. त्यामुळे सर्वांनी याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. तसेच गडाच संवर्धन हे केलेच पाहिजे. त्यामध्ये किल्ल्यावरील प्लास्टिक बाटल्या, तुटलेल्या चपला, खाऊच्या पुड्या, गुटख्याच्या पुड्या तसेच इतर सर्व प्रकारचा कचरा जवळपास ४० गोण्या कचरा गोळा करून तो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आणण्यात आला व जुन्नर नगरपरिषद येथे सुपूर्द केला.

अग्रण धुळगाव, सांगली व पुणे येथून सकाळी लवकर सदस्य किल्ल्याच्या पायथ्याशी एकत्र जमले आणि उत्साहात स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. विशेष म्हणजे स्वराज्य संग्राममध्ये लहान मुले व महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. नवीन पिढीला केवळ ऐतिहासिक वारसा सुपूर्द करण्यापेक्षा त्यांना स्वच्छता व संवर्धनाचे भान देणे हाच या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

मोहीमेच्या दरम्यान ब्लूटूथ स्पीकरवर शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेले पोवाडे ऐकत सर्वांनी मोठ्या जोमाने आणि उत्साहात ही मोहीम यशस्वी केली.

यावेळी बोलताना स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड म्हणाले, “गेली दहा वर्षे आपण स्वच्छता मोहीम राबवत आहोत. मात्र स्वच्छता मोहिमेनंतर वर्षभर काय करायचे? तर ‘आपले स्वराज्य! आपले उद्योजक!!’ ही चळवळ आता जोमाने पुढे न्यायची आहे. प्रत्येक छोटी-मोठी खरेदी आपल्या स्वराज्यातील १८ पगड जाती-धर्मातील बांधवांकडूनच झाली पाहिजे. आपली लोकं म्हणजे कोण? तर ज्यांचा रक्तगट शिवराय आहे अशा सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य आपण यापुढे करूया.”

स्वच्छता मोहिमेचे आयोजन स्वराज्य संग्रामचे रमेश खंडागळे, संदीप कोकाटे, योगेश मोटे व रणजीत पाटील यांनी केले. तसेच डॉटर्स मॉम क्लबच्या सर्व सदस्यांनी आणि लहान मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रम अधिक प्रेरणादायी केला.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!