🔷 आजचा महाराष्ट्र जुन्नरचा, की सिन्नरचा ? बदलाची गरज – संजय आवटे
🔷 नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील तोच विकास.
‘महाराष्ट्र धर्म आणि पत्रकारिता’ परिसंवाद
👉 महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाची स्थापना
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघाची स्थापना व पत्रकारांच्या नव्या राज्यव्यापी चळवळीची सुरूवात करण्यात आली.
राज्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई या राज्यव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आली असून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सशक्त, जबाबदार पत्रकारितेसाठी सुरू झालेली ही केवळ संघटना नसून नव्या चळवळीची सुरुवात असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर संयुक्त महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गोविंद घोळवे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, न्यूज 18 मराठी चे संपादक, मंदार फणसे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, लोकमत चे संपादक संजय आवटे, मुक्तपीठ चे संपादक तुळशीदास भोईटे, महाराष्ट्र रिसर्च सेंटर चे संपादक महेश म्हात्रे, ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी, गुणवंत पाटील, बेळगाव लाइव्ह चे संपादक प्रकाश बेळगोजी, बीव्हीजी ग्रुप चे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, उद्योजक उमेश चांदगुडे, बीएसए ग्रुप चे प्रमुख बाळासाहेब कदम, सीमा सावळे, म. ए. समिती चे सागर पाटील, संत ज्ञानेश्वर आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखने, अभिनेत्री आर्या घारे व प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतरही अनेक प्रश्न आजही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पत्रकारांनी एकत्र येत या महासंघाची स्थापना केली. पत्रकारांच्या समस्या, बदलते माध्यमविश्व आणि आधुनिक पत्रकारितेची दिशा यावर या माध्यमातून व्यापक पातळीवर काम केले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या स्थापना सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे होते, तर परिसंवादाचे उद्घाटन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर रवी लांडगे, आमदार शंकर जगताप तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि आधुनिक पत्रकारिता’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लोकमतचे संपादक संजय आवटे, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, न्यूज १८चे संपादक मंदार फणसे,जेष्ठ विचारवंत लेखक संजय सोनवणी यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकारांनी आपले विचार व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवलेला महाराष्ट्र धर्म आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली.
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, “महाराष्ट्रात आज मराठी भाषा टिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र बनवताना भाषेचा इतिहास विसरता कामा नये. भाषिक शब्दकोश समृद्ध व्हावे. मराठी भाषेत इतर भाषेचे पर्यायी शब्द न वापरता अधिकाधिक मराठी भाषेतील शब्दांचा वापर व्हावा.”
मंदार फणसे यांनी महाराष्ट्रातील विविधतेतून समृद्ध महाराष्ट्र रूप तसेच संयुक्त महाराष्ट्राची गरज यावर आपले विचार व्यक्त केले.
महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगाने बोलत असताना संजय आवटे म्हणाले, “आपल्याला महाराष्ट्राची परंपरा जपण्याची गरज आहे. आज महाराष्ट्रात जात – धर्माच्या अनुषंगाने प्रचंड ध्रुवीकरण सुरू आहे. जात धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र धर्म टिकवला पाहिजे.”
महेश म्हात्रे यांनी ‘मराठी विन गाडा न चाले देशाचा’एकेकाळी अशी उक्ती असताना आज प्रचंड विरोधाभास दिसून येतो. महाराष्ट्रातील संपर्क वैचारिक, भावनिक पातळीवर एकत्र यायला हवा. मराठी भाषिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत हे सांगितले.
तुळशीदास भोईटे यांनी तरीसुद्धा पंचशील तत्वे विशद करताना, पत्रकारांसमोरील आव्हाने, पत्रकारांची तटस्थ भूमिका, निष्पक्षता स्पष्ट केली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अभ्यासक गुणवंत पाटील यांनी कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषेच्या पत्रकारांच्या वेदना व अनुभव मांडले. या ते म्हणाले मराठी भाषिकांच्या संघर्षासाठी उभ्या असलेल्या रस्त्यावरील संघर्ष करणाऱ्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. मराठी भाषेतील नावाच्या पाट्या खरवडल्या जात असून, त्याच्या वेदना मराठी भाषकांच्या हृदयावर होत आहेत. त्या जखमा अधिक वेदनादायी आहेत.”
जेष्ठ विचारवंत संजय सोनवणी यांनी महाराष्ट्र राज्याचा भाषिक समृद्ध इतिहास सांगितला. मात्र, आज सर्व क्षेत्रातील उध्वस्त परिस्थिती बनल्याची खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश सचिव नितीन शिंदे, शहराध्यक्ष रोहित आठवले तसेच महासंघाच्या पदाधिकारी व सभासदांनी केले होते. महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर झालेल्या या स्थापनेमुळे राज्यातील पत्रकारांना एक नवे सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सातव व आभार अतुल क्षीरसागर यांनी केले.

Comments are closed