जयशिंगपूर ,दि.४(punetoday9news):-  राजू शेट्टींची गरज देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आहे.आज देशातील अनेक शेतकरी संघटना एकत्र करून राजू शेट्टी यांनी देशाच्या पातळीवर सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट तयार केली. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी देश पातळीवर लढा उभा केला आहे .ऊसाचा भाव ३००० रुपयांच्या वर नेला आहे . राज्यातील व देशातील सगळे शेतकरी राजू शेट्टींकडे अपेक्षेने बघत आहेत म्हणून देशातील शेतकरी चळवळ टिकण्यासाठी कोल्हापूर सांगलीकरांनो या माणसाला काळजात अखंड जपा..असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले.

 





जयशिंगपूर येथे झालेल्या राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १९ व्या ऊस परिषदेत बोलत होते.
या देशात लोकशाही येऊनही इथे दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. इथल्या शेतकऱ्यांच्या अंगावरची साल ओरबडली जाते. वावरात घाम गाळून पिकवलेल्या पिकाचे मोल ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला मिळाला नाही.पण २००२ पासून ऊस परिषद घेऊन स्वतःच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा व तो वेळ प्रसंगी रक्त सांडवून मिळवण्याचा आदर्श राजू शेट्टी यांनी देशातल्या शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. या संघर्षात अनेकदा अंगावर पोलिसांच्या लाठ्याकाठया पडल्या. गुंडांनी जीव घेणे हल्ले केले.. असंख्य गुन्हे झाले.पण हा लढा १८ वर्ष जीव पणाला लावून राजू शेट्टींनी यशस्वी केला.
रात्रंदिवस या माणसाने कष्ट घेतले .महिना महिना घरी न येता राज्यभर , देशभर शेतकऱ्यांसाठी लढत राहिले.पण लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेत जातीयतेचं विष पेरून , अफवा पसरवून राजू शेट्टींचा पराभव केला. या पराभवामुळे चळवळीत काम करणाऱ्या नवपिढीचा आत्मविश्वास ढासळू लागला. भविष्यात चळवळ पंगू झाली तर शेतकऱ्यांचे मोठे शोषण होत राहील. राजू शेट्टी सारखं सामान्य कुटुंबातील असामान्य नेतृत्व कोल्हापूरच्या जनतेनंच खांद्यावर घेतलंय..व राजू शेट्टींनीही स्वतःचं आयुष्य शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे समर्पित केले.राजकारणात राहूनही स्वतःचे हात स्वच्छ ठेवले. म्हणून देशातल्या शेतकऱ्यांचा लढा लढण्यासाठी या प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी प्रमाणे खंबीर उभे रहा. अफवांना बळी पडू नका..राजू शेट्टींना काळजात अखंड जपा. असे संदीप जगताप यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूर- सांगली च्या जनतेला भावनिक आवाहन केले.




Comments are closed

error: Content is protected !!